आज सकाळी सकाळी मला एका मित्राने एस.एम.एस.पाठवला.. A cute letter by a small kid who hates Maths. ." dear maths, please grow up soon and try to solve your problems yourself!!!!!" मी इतकी हसले माहितेय...मला त्या मुलामध्ये मीच दिसायला लागले...!!!
गणित..कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! म्हणजे मार्क कमी मिळायचे, पेपरात भोपळे मिळायचे असं काही नाही बरं का.. पण गणित म्हटलं की कंटाळाच यायचा.. अगदी पाचवी-सहावीत असल्यापासूनच... माझे काही मित्र अगदी हिरीरीने अल्जेब्रा / भूमितीतली प्रमेय सोडवत बसलेले असायचे, आणि माझं लक्ष गणिताच्या तासाला कायम वर्गाच्या बाहेर खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावर, झाडांवर, पक्ष्यांवर असायचं!! या रुक्षपणात इतकं रंगून जाण्यासारखं काय आहे? हे कोडं मला कधीच उलगडलं नाही... एक गंमत तर अगदी हमखास करायचे मी, म्हणजे गणिताच्या पेपरात संपूर्ण गणित चोख सोडवायचे, सगळ्या स्टेप्स एकदम करेक्ट..पण उत्तर लिहिताना १२३ च्या ऐवजी १३२ किंवा xyz च्या ऐवजी yxz !!! माती सगळी!!! पायथागोरस वगैरे महनीय प्रभृतींनी तर जिणं हराम केलं होतं माझं! कारण आमचं गणिताबद्दलचं आकलन अगाध.. अरे तू तुझ्या घरात लाव न काय लावायचेत ते शोध.. आम्हाला काय त्रास!!! असा जेन्युईन त्रागा मी कित्येक वर्षं केलेला आहे.. पण राज्यशासन, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, शिक्षणतज्ज्ञ वगैरेंना माझी कधीच दया आली नाही..!! आणि वर्गमुळं, घनमुळं, परिमिती, त्रिज्या, चक्रवाढ व्याज अशा भीतीदायक शब्दांची आक्रमणं माझ्या कोमल मनाला घायाळ घायाळ करत राहिली.. कर्कटक, कंपास अशा हिंसक, हानिकारक वस्तू मुलांच्या इतक्या लहान वयात हातात देणं कित्ती चुकीचं आहे...आपल्या समाजातली हिंसक प्रवृत्ती यामुळेच वाढीला लागली असणार!!!
चुकून एकदा कशी कोण जाणे पण गणित प्राविण्य परीक्षेच्या पुढच्या फेरीसाठी माझी निवड झाली.. (मंडळाचं मार्कांचं गणित चुकलं असणार!!) तर त्याच्या तयारीसाठी आमच्या शाळेने एक कार्यशाळा घेतली.. दोन दोन मुलांची एक जोडी.. आणि नेमकी मी होते गणिताच्या प्रचंड वेड्या आणि आमच्या शाळेतल्या सगळ्यात हुशार मुलासोबत!! भीषण!!!!! अहो, त्याला काहीही यायचं इयत्ता सातवीत... मी भयचकित.. माझं मन त्याच्याविषयीच्या अत्यादराने आणि स्वतःविषयीच्या आत्यंतिक न्यूनगंडाने भरून आलं!! एक रुपयाच्या नाण्याचं वजन, का क्षेत्रफळ का असंच तत्सम काहीतरी शोधून दाखवायचं होतं.. मी बावळटासारखी बघतच राहिले.. "हातात आलेल्या एक रुपयाची शाळा सुटल्या सुटल्या कैरी चिंच घ्यायची.." आमच्या निर्बुद्ध डोक्यात हे असलेच विचार कायम! तोवर या पट्ठ्याने मात्र त्या नाण्याला दोरा गुंडाळून, काहीतरी आकडेमोड करून उत्तर शोधलं सुद्धा.. तो फॉर्म्युला मला आजपर्यंत कळला नाहीये..!
आज मागे बघताना या सगळ्याची खूप गंमत वाटतेय. आमच्या वर्गात फळ्यावर रोज एक सुविचार लिहिला जायचा. त्यापैकी एक अगदी डोक्यात बसलाय. 'ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्याविषयी कधीही दु:ख्खी होऊ नये.' त्यावेळी बाकी तात्त्विक अर्थ कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता.. 'आपल्याला गणित कधीच धड कळणार नाही, ही गोष्ट कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे याच्याविषयी कधी दुःख्खी होऊ नये!!!' आणि इमाने इतबारे मी आजतागायत त्याचं पालन केलंय. शेवटी कसं आहे, त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!! ती गणितं सोडवायची शक्ती मला सतत मिळत राहो,ही पायथागोरस चरणी प्रार्थना...!!!:-)