Saturday, October 24, 2015

जगण्‍याला'ला पडलेले प्रश्‍न

स्वत:च्या मनाचं ऐकून तसंच प्रत्यक्ष वागण्याची हिंमत फार कमी जणांकडे असते. या दोघीही त्याचं मूर्तिमंत प्रतीक. अभिनयाच्या बाबतीत तर काय बोलावं. नैसर्गिक अभिनयाच्या चालत्याबोलत्या पाठशाळाच जणू. चश्मेबद्दूर, कथा, अनकही, मेमरीज इन मार्च मधली दीप्ती आणि अर्थ, भूमिका, मंडी, मंथन यांतली स्मिता कशी आणि कोण विसरू शकेल? अर्थात त्यांची अभिनयशैली, चित्रपट क्षेत्रातलं त्यांचं योगदान या सगळ्याबद्दल मी चर्चा करत नाहीचे आत्ता. कारण मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणं म्हणजे बेसिक काजव्यानं तळपत्या सूर्याकडे झेपत नसताना डोळे फाडफाड उघडे ठेवून बघत राहण्याचा अट्टहास करण्यासारखंच आहे. पण या दोघींचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे, हेही तितकंच खरं. आज हे सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी एक ‘न पाठवलेलं पत्र’ माझ्या वाचनात आलं. मुळात ‘पत्र’ या विषयाबद्दल मला खूप ओढ आहे. त्यामुळे खेचली गेले मी त्याच्याकडे. पत्र नव्हतं ते साधंसुधं. कविताच होती मुक्त. ओठंगून आलेल्या भावना होत्या. पूर्वी कधी काळी सांगायचं राहून गेलेलं, व्यक्त-अव्यक्तसं बरंच काही होतं त्या काही ओळींमधून ओसंडणारं. मनात घर करून गेला त्यातला पारदर्शी नितळपणा. ते पत्र होतं दीप्तीने आपल्या मैत्रिणीला, स्मिताला लिहिलेलं.. ती गेल्यावर... त्या हृदयस्पर्शी कवितेचा भावानुवाद आपल्याशी शेअर करते आहे. कारण बघायला गेलं तर हे आपल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यांच्या चंदेरी दुनियेतून, त्या झगमगाटातून ही कविता आपल्या जगण्याशी जोडून पाहा, तुम्हाला जाणवेल की हे आपलेही प्रश्न आहेत.

सतत धावताना 
आपापल्या स्वप्नांपाठी 
आपण भेटायचो प्रत्येक वेळी- 
बॅगेज क्लेम्स 
व्ही. आय. पी लाउंजेस 
चेक- इन काउंटर्स.. 

एखादा क्षण एकत्र उभे राहायचो 
‘आ’ वासून पाहणार्‍या 
लोकांच्या घोळक्यामध्ये, 
बोलल्या - न बोलल्या 
गेलेल्या शब्दांमध्ये! 
तळमळत होतो, 
काही सांगण्यासाठी (एकमेकींना.) 
पण घाबरलो होतो, 
घाबरलो होतो, स्वत:लाच!! 

आपल्या सभोवताली लोक ओरडत होते, 
नजरेने फाडून खात होते, 
आणि हा सगळा वेडेपणा 
आपण नुसत्या पाहत होतो, 
‘आपलेच’ चश्मे घालून. 

‘तो’ एकच खराखुरा क्षण 
जगण्याचा प्रयत्न करत होतो, 
एकच नजर, एकच स्पर्श, 
एकत्र असावंसं वाटणं. 
. आणि पुढे जात होतो. 

आपण शेवटचे भेटलो, 
विमानाची वाट बघत, 
मला आठवतंय मी म्हणाले होते, 
‘‘हे आयुष्य जगण्याचा 
यापेक्षा वेगळा काहीतरी 
मार्ग असेल, असेलच न??’’ 

खूप वेळ तू शांत राहिलीस, 
आणि मग, पापणीही न हलवता 
माझ्याकडे वळूनही न बघता म्हणालीस, 
‘‘नाही. कधीच नसतो.!!’’ 

आज 
तू निघून गेलीयेस, 
आणि मी मात्र अजूनही 
धावतेच आहे; 
तू चुकीची होतीस 
हे सिद्ध करण्याचा वेडा प्रयत्न 
मी अजूनही करतेच आहे.! 
- दीप्ती

1 comment:

  1. जगण चारी दिशांनी झाकोळून गेल तर मार्ग आहे. निश्चित आहे . अलिप्ततेचा . रेशमी कोशातून बाहेर पडण्याची हिम्मत मात्र झाली पाहिजे . तेच तर अवघड आहे . सर्वांसाठीच .

    ReplyDelete