Thursday, February 4, 2016

स्वीकार

ओशो रजनीश. भारतातल्या विवादास्पद पण तितक्याच लोकप्रिय अध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव. त्यांचे सिद्धांत, मूल्यधारणा या गोष्टींवर वाद असतील कदाचित. किंबहुना आहेतच. पण त्यांचे विचार हे अतिशय पारदर्शी आणि स्वतःला शोधत खोल खोल नेणारे आहेत.
   “जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता, ती गोष्टच तुम्हाला दुसऱ्याचा स्वीकार करण्यासाठी योग्य बनवत असते. आणि जेव्हा कोणी त्यांचा स्वीकार करतं, तेव्हाच ते ‘स्वीकारा’तला आनंद शिकत असतात. किती शांतीपूर्ण आहे हे. आणि मग तेही दुसऱ्यांना स्वीकारायला लागतात. जर संपूर्ण मानवता या बिंदूपाशी येऊन पोचली, जिथे प्रत्येकजण तो ‘जसा आहे तसा’ स्वीकारला जाईल, तर जगातली नव्वद टक्के दुःखं अशीच संपून जातील.” 
                                       – ओशो रजनीश.
.... इथेच आधी थांबायला होतं. पहिल्या ओळीवरच. स्वतःचा स्वीकार? म्हणजे काय नेमकं? आपण पूर्णपणे ओळखलेलं असतं स्वतःला? नेमकं काय हवंय स्वतःकडून, समोरच्याकडून ते आपल्याला ठाऊक असतं? कित्येकदा आपण झुली पांघरतो. वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्या रंगाला हरवू देतो. कित्येकदा आपण ‘असं’ काही करतो आहोत हेसुद्धा कळत नाही. ‘कोणासाठी तरी’ म्हणून इच्छा, स्वप्नं दडपली जातात. पण आपल्यासाठी ती सहज गोष्ट असते. निदान त्यावेळेपुरती तरी. आपण त्याला नशीब म्हणतो, प्राक्तन म्हणतो, देवाची इच्छा असंही म्हणतो. पण नेमकं त्यावेळेला आपल्याला ‘ते’ हवं होतं, की नाही याचं प्रांजळ उत्तर आपण नाही देऊ शकत. किंबहुना तसा प्रश्न विचारायलाच कचरतो आपण. कारण सरळ आहे. प्रत्येक पावलावर स्वतःला जे फसवलंय, ते ढळढळीतपणे सामोरं येईल म्हणून. त्याला तोंड द्यायला कचरत असतो आपण म्हणून.
पण मग अशा वेळेस स्वीकार कोणाचा करायचा? आपण जे आहोत, त्याचा? की आपण जे आहोत असं दाखवतो, त्याचा?? हे कळलं तरी पुष्कळ आहे. कारण या पहिल्या पायरीशी न झगडता आपण दुसऱ्या पायरीवर थेट उडी मारली तिथेच सगळा झोल झाला! डायरेक्ट दुसऱ्याचा स्वीकार. पण कसा? कारण तिथे तो बिचाराही याच डायलेमामध्ये अडकलेला असणार. खोटेपणाचा हाच खेळ.. वर्षानुवर्ष. पिढ्यानपिढ्या.. निदा फाझली फार सुंदर लिहून गेलेत.
“किसी कसाईने इक हड्डी छील कर फेंकी
गलीके मोड से दो कुत्ते भोंकते उठे
किसी ने पाँव उठाए
किसी ने दुम पटकी..
न जाने मेरा जी चाहा
अपने सब कपडे उतार कर
किसी चौराहे पर खडा हो जाऊँ
हर एक चीज पर झपटूँ
घडी घडी चिल्लाऊँ
निढाल होके – जहाँ चाहूँ
जिस्म फैला दूँ
हजारो साल की सच्चाइयों को झुठला दूँ....”
हाच तो ओशो म्हणतात तो ‘स्वतःचा’ स्वीकार.. ही ती पहिली पायरी. मग आपण स्वीकारतो ते कोणाला? की खरंतर कोणालाच नाही? या प्रश्नांचं हो/ नाही मध्ये उत्तर नाही. पण ‘जसं आहे तसं’ जगणं आणि जगू देणं याला फार मोठं धाडस लागतं. ‘जीवन अभी यही है’, आणि ‘प्रत्येक पल मरो, ताकी तुम हर क्षण नवीन हो सको’ म्हणणारे ओशो या खरेपणामुळेच एकाच वेळेला नकोसेही वाटतात, आणि हवेसेही!  

स्पृहा जोशी

2 comments:

  1. ओशो... बस नाम ही काफी है| खूप छान विश्लेषण केलंस तू स्पृहा. सौजन्य ??

    ReplyDelete
  2. खूप छान,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,स्पृहा

    ReplyDelete