Sunday, September 11, 2011

आनंद

सकारात्मकता... एकदम केवढा मोठ्ठा शब्द आला न सुरुवातीलाच.. हा मूल्यशिक्षणाचा ता(त्रा)स चालू आहे का, असंही मनात येऊन गेलं असेल! पण शाळेत हा शब्द कानावर पडण्याच्या, आणि त्याचा कंटाळा येण्याच्या खूप आधी मला हे शिकवलं एका साध्या  पिक्चरने...'आनंद' ने!! तेव्हा त्यातलं सगळंच कळलं होतं अशातला भाग नाही.. पण 'आपण आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी  ठेवणं' या कल्पनेतली गंमत जाणवली होती.. पुढे मंगेश पाडगावकरांची 'सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत' ही कविता वाचताना, हा 'आनंद सेहगल' च आपल्याशी बोलतोय, असा साक्षात्कार झाला. आणि एखादा जुना मित्र भेटावा तितका आनंद झाला मला..
मुळात, हल्ली जिथे तिथे ज्याच्या त्याच्या तोंडी 'मला टेन्शन आलंय, फ्रस्ट्रेशन  आलंय' हे इतकं सहज ऐकू येतं.
अरे यार, काय रडेपणा चाललाय? ज$$$रा विचार करा, तुम्ही एका गॅलरीत उभे आहात, खालून सांडपाण्याचं गटार वाहतंय, आणि आकाशात एक छानसा लुकलुकणारा तारा आहे; तर तुम्ही आनंदाने तारा बघणार,का गटार बघून तोंडं वेंगाडणार!! चॉइस तुमच्या हातात असतोय की राव !!


कदाचित याच पॉझीटीव्ह भूमिकेमुळे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी 'आनंद' सारखा मास्टरपीस बनवला असेल. त्यांना साथ मिळाली ती गुलजार, योगेश, सलील चौधरी यांसारख्या प्रतिभावंतांची आणि त्याचबरोबर गुणी अभिनेत्यांची.. सतत बोलणाऱ्या, रसरसून आयुष्य जगणाऱ्या आनंदची भूमिका सुपरस्टार राजेश खन्ना अक्षरशः जगलाय. 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही!' असं सांगणारा आनंद मनाला स्पर्श करून जातो, तो उगाच नाही! चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमला खरंतर आपल्याला कळतं की आनंद मरण पावला आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक दृष्यागणिक आपण त्याच्या प्रेमात पडत जातो, आणि तो जिवंतच राहणार असेल, तो मरूच नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत राहतो.. तो गेल्यानंतरचा 'बाबूमोशाय' अमिताभचा आक्रोश हा त्याच्या एकट्याचा नसतो, तर पाणावलेल्या डोळ्यांनी मूकपणे आपल्याही मनात तेच भाव दाटून आलेले असतात..
'आनंद' ची सगळी कमाल हे त्यातील पात्रं ज्या भाषेत बोलतात, त्यात आहे असं मला वाटतं. "जब तक जिंदा हूँ,तब तक मरा नहीं. जब मर गया, साला मैं ही नहीं; तो फिर डर किस बात का!" अंगावर प्रत्येक वेळी काटा येतो हे ऐकताना. आणि पिक्चरच्या सुरुवातीला आकाशात दूर हरवत जाणाऱ्या फुग्यांच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारं येणारं "जिंदगी कैसी है पहेली" हे गाणं??? 'आनंद' चं स्पिरीट सांगणारं हे गाणं, खरंतर शाळांमधून कविता म्हणून शिकवायला हवं! मग मूल्यशिक्षणाचे ओव्हरडोस नसले तरी चालतील..

कारण कसं आहे, सकारात्मकता अशी डोस पाजून 'इंजेक्ट' नाही करता येत.. ती अंगात मुरवावी लागते, रुजवावी लागते.. 'आनंद सेहगल' सारखी! बाकी सगळं सोडून देऊ पण 'आनंद' मधून एक जरी गोष्ट आपण शिकलो न, तरी सगळं साधलं.." मरते मरते चेला गुरु को जीना सिखा गया, दुख अपने लिये रख, आनंद सबके लिये...!!!!"







Tuesday, September 6, 2011

मोरया.

तूच माझी आई देवा, तूच माझा बाप
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप
चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया
 घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया..!!
दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन ही माझ्यासाठी स्पेशल गोष्ट असते.. आणि यंदा तर 'मोरया' मुळे हा गणेशोत्सव आणखीनच स्पेशल झाला माझ्यासाठी.. आज सर्व थरांतून या चित्रपटाला जे उदंड प्रेम मिळतंय, जो अमाप प्रतिसाद मिळतोय ही बाप्पाचीच कृपा नाहीतर काय..आज म्हणूनच मोरयाच्या आठवणी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतायत..
गणपती ही बुद्धीची देवता..'मोरया' च्या अगदी सुरुवातीच्या मिटींग्स मध्येच जाणवत होतं की बाप्पाचा वरदहस्त असलेल्या अतिशय क्रिएटिव्ह लोकांसोबत आपण काम करतोय.. संगीतदिग्दर्शक म्हणून लोकांची कौतुकाची पावती मिळवून आता उत्तम दिग्दर्शक अशी ख्याती कमावणारा अवधूत गुप्ते, अप्रतिम स्क्रीनप्ले आणि संवाद लिहिणारा सचिन दरेकर, उत्कृष्ट छायाचित्रण करणारा राहुल जाधव, समजून उमजून जीव ओतून काम करणारे संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर, अष्टपैलू गणेश यादव, ज्यांचं नाव घेताना आदरयुक्त प्रेम वाटतं असे, द ग्रेट दिलीप प्रभावळकर... नावं तरी किती घ्यायची... या सगळ्यांसोबत आपण काम करणार ही कल्पनाच मुळी खूप एक्सायटिंग होती. त्यामुळे शूटिंगचे सगळे दिवस हा एक आठवणींचा ठेवा बनून राहिला.
मुळात मला नेहमी पडणारे बरेच प्रश्न या चित्रपटात विचारले गेलेत..त्यामुळे आपण काहीतरी खूप आपल्या मनातलंच सांगतोय असं वाटत होतं.. स्क्रिप्टशी नातंच जुळून गेलं. गणपतीबाप्पा वर मनापासून प्रेम आहे माझं..त्यामुळे हा गणेशोत्सवाचा नाटकी झगमगाट का, कशासाठी, कोणासाठी? असं नेहमी वाटायचं. अचकट विचकट डान्स, डीजेचा ढणढणाट, पैशांची कोट्यानुकोटी उड्डाणे, केवढाले तरी सेट्स, या सगळ्यात एरवी खूप जवळचा असलेला बाप्पा हे दहा दिवसच आपल्यापासून दूर गेल्यासारखा वाटायचा.. 'मोरया' ने नेमका ह्याच भावनांना हात घातला. ''झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला,रोषणाई मध्ये देव माझा हरवून गेला..!!"
आणि त्याच्याच बरोबर हेही मोकळेपणाने मान्य करायला हवं की 'मोरया' करताना जाणवली साध्यासुध्या, भोळ्याभाबड्या गणेशभक्तांची, स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची तळमळ. कुठलीही अपेक्षा नसते त्यांची, कुठेही झळकायचं नसतं त्यांना. ना कुठलाही 'क्रेडीट' हवं असतं. मोरया मध्ये संतोष आणि चिन्मय च्या कामाला लोकांनी डोक्यावर घेतलं, यात त्यांच्या अभिनयाला दाद तर होतीच; पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या मनोज आणि समीर मध्ये त्यांनी स्वतःला पाहिलं. या दोघांमध्ये त्यांनी आपलंच प्रतिबिंब पाहिलं!
मला अतिशय आवडणारं 'मोरया' मधलं पात्र, म्हणजे कामत काका.या व्यक्तिरेखेला दिलीप काकांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. एका प्रसंगात कामत काका म्हणतात, "अमुक अमुक राजा पावतो, म्हणून त्याच्या दर्शनासाठी रांगा लावता; आणि उजव्या सोंडेच्या गणपतीला घाबरता..अरे ही काय श्रद्धा म्हण्यची!!" किती खरं आहे हे.. सध्या रोज उघड्या डोळ्यांनी पेपर वाचत असाल, बातम्या पाहत असाल तर, तुम्हालाही हे भयाण, दाहक वास्तव नक्कीच जाणवलं असेल, हो ना?
लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हाचा आणि आताचा उत्सव यात जमीन-अस्मानाचा फरक पडलाय. आपण सगळ्यांनीच हे मान्य करायला हवं. सगळं बदललं, छोटे छोटे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, फुलांची आरास, छोटीशी गोजिरवाणी मूर्ती.. आता भव्य मंडपांमध्ये राजकीय नेत्यांचे बॅनर्स आले, जुगाराचे अड्डे आले, दारूच्या बाटल्या आल्या.. मांगल्य, पावित्र्य हे नुसते शब्द म्हणून उरलेत.. एकाच गोष्ट बदलली नाही.. ती म्हणजे, मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची तळमळ, त्याचं निखळ प्रेम आणि त्यांची निरागस भावना... आशेचा किरण म्हणूनच वाटल्यावाचून राहत नाही..
'मोरया' करताना हे सगळं परत परत जाणवत राहायचं, आणि या इतक्या छान प्रोजेक्टचा आपण लहानसा का होईना पण एक भाग आहोत, या कल्पनेनेच खूप आनंद व्हायचा.. शेवटी सगळ्याचा कर्ता-धर्ता तोच.. त्याची अशीच कृपादृष्टी राहो एवढीच त्या विघ्नहर्त्या गणेशाजवळ प्रार्थना..
"गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रागणराया
     वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया...!!!!"

Sunday, September 4, 2011

माझी मुलाखत.. तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करताना खूप आनंद होतोय!
'मोरया' च्या निमित्ताने जे उदंड प्रेम दिलंत, जो प्रतिसाद दिलात त्यासाठी मनापासून आभारी आहे. आपलं असंच प्रेम आणि आशिर्वाद सतत पाठीशी राहोत !!!
- स्पृहा.

Saturday, July 23, 2011

"सुख दुखतंय...!!!”

निवांत बसण्याच्या एखाद्या क्षणी मन उगाचच काहीतरी विचार करत राहतं. इच्छाही नसते खरंतर. पण त्या विचारांच्या स्पीडशी आपण मॅच नाही करू शकत स्वतःला.. फरफटत जात राहतो. एक वेगळंच युद्ध चालत राहतं आपलं. कुठल्या कुठल्या आठवणी सगळं सावरलेलं आवरलेलं उस्कटून विस्कटून टाकत दात विचकटत आपल्याभोवती पिंगा घालत राहतात..
आजच का व्हावं असं? बरं चाललंय की सगळं. घरी-दारी, शेजारी- पाजारी सगळं उत्तम आहे. हसरं घर आहे, जिवाचे जिवलग आहेत, मायेची माणसं आहेत... तरीसुद्धा ही टोचणी कशाची? अपूर्णतेची ही जाणीव का म्हणून? चला.. बास झालं.. एका वेळी ठरवून एकाच गोष्टीवर विचार करायचा... सतरा भुंगे एकत्र नकोत.. पण नाही.. माझा हट्टीपणा मनात आलाय की काय आज?? मी सांगितलेलं काहीच ऐकत नाहीये ते.. मी वेड्यासारखी हताश होतेय त्याचा हा चमत्कारिक अट्टाहास बघून...
काय बरं सांगत होते मी... पाहिलं, हे असं करतंय मन... आता इथे तर लगेच कुठे भलतीकडेच... किंवा गायबच अचानक... एखाद्या थंड शिखरावर वगैरे बसतंय जाऊन... ढोंगी... आगाऊ... आत्ता मी रडवेली झाले न, की मग त्याचा जीव भांड्यात पडेल... काय करणार आपण तरी.. स्वभाव असतो एकेकाचा..
स्वभाव??? कोणाचा स्वभाव?? मनाचा??? माझ्या मनाचा?? म्हणजे माझाच न?? नाही पण.. मी कुठे असं वागते? मला नाही आवडत कोणाला उगीचच रडवायला!! मग कोणाचा स्वभाव आहे हा?? आणि तो माझ्या मनाचा कसा झाला?? कुठून आला तो त्याच्यापाशी? म्हणजे माझं मन मला न सांगता असं एकटच फिरायला जातं?? भरकटत भरकटत भलभलत्या माणसांना भेटतं; आणि मग त्यांचे स्वभाव घेऊन येतं??
एक एक एक मिनिट.. मला नक्की वाईट कशाचं वाटत होतं?? पुन्हा विसरले मी... मळभ आलं होतं म्हणून?... हं.. आठवतंय थोडं थोडं.. गळ्यापर्यंत काहीतरी आलंय, श्वास अडकेल की काय असं वाटतंय.. आपलं सगळं चुकतंय.. वागणं चुकतंय.. दिसणं चुकतंय, हसणं चुकतंय, बसणं चुकतंय.. कदाचित, कदाचित ‘असणंच’ चुकतंय.. पुन्हा एक उसासा!!! एक अश्रू सुद्धा.. आतून खराखुरा उमाळा येतोय... काय करावं?? कधी कधी स्वतःच स्वतःची समजूत नाही काढू शकत.. पुरे नाही पडू शकत आपण..
तेवढ्यात बाजूचा फोन वाजतो.. ओळखीचं एखादं नाव स्क्रीन वर फ्लॅश होतं.. रडता रडता आपल्याच नकळत हसतो आपण.. तो एकच आवाज ऐकून इतका वेळ भयभय करणारं येडपट मन शांत होतं एकदम.. मळभ दूर जातं जातं...आणि पाऊस कोसळायला लागतो, झिम्माड... आपले उमाळे, उसासे समजून घेत फोनवरचा तो आवाज गालातल्या गालात हसतो हलकेच...आणि हळुवारपणे म्हणतो..."काही नाही...तुला सुख दुखतंय...!!!

Wednesday, July 13, 2011

अधीर श्रावण

अधीर श्रावण, मनात पैंजण
उनाड वाहे वारा,
आठव येता तुझी माधवा
देह सावळा सारा..
अशांत यमुना, उदास गोकुळ
उधाणलेला पूर,
दूर तिथे तू, तरिही छळतो 
तुझा पावरी सूर.
कोमल स्वप्ने, मधुरा भक्ती
जपते राधा वेडी,
पायांमध्ये जणू घातली 
कुणी फुलांची बेडी!
हळवे तनमन, सरले 'मी'पण 
गर्दनिळीही भूल,
निळसर मोहन, राधा झाली 
निशिगंधाचे फूल..!!

-स्पृहा.   

Tuesday, July 12, 2011

वाचू आनंदे!!: Relationship

वाचू आनंदे!!: Relationship: "Relationship - Nayantara Sahgal E. N. Mangat Rai (HarperCollins Publishers, Price- Rs.395) When Relationship wa..."

Thursday, July 7, 2011

आनंदाचा कंद, विठ्ठल सावळा!

आषाढी एकादशी आली...आत्ता चंद्रभागेच्या वाळवंटात एकच आनंद भरून राहिला असेल..हरिनामाचा उद्गार आसमंत व्यापून राहिला असेल.. हजारो- लाखो साधे सुधे,भोळेभाबडे जीव विठ्ठल रंगात रंगून गेले असतील. आणि आपण?? टीव्हीवर आणि पेपरात वारी पाहणारे आपण.. त्यांच्या श्रद्धेला तुच्छ लेखत डेली सोपच्या बिनडोक एपिसोड मध्ये नाहीतर पेज थ्रीच्या चमचमीत गॉसिप मध्ये रमणारे आपण..  'कशाला इतका वेळ त्या वारी-बिरी मध्ये फुकट घालवतात हे लोक! मूर्खपणा आहे सगळा..' असं म्हणत वारीमागच्या लॉजिकलाच 'डाऊन मार्केट' करून टाकणारे आपण!! आपल्या सामान्यपणाच्या कोशालाही अहंगंडाने चिकटून राहणारे आपण..!! खूप उचंबळून येतं मला हे सगळं वाचताना, त्या वेड्या वारकऱ्यांना पाहताना. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते वेगळंच समाधान पाहताना..आपल्या 'शहाण्या' जगण्यात कधी इतकं निर्मळ हसतो आपण? कधी आवेगाने व्यक्त होतो? कधी श्वास घेतो मोकळेपणाने? 'वारी' हेच शिकवत असणार त्यांना. रोजच्या कष्टांनी गांजलेल्या, हालांनी पिचलेल्या जाण्यावर मायेची थंड फुंकर घालत असणार वारी.. हे अनुभवायचंय मला, त्यांच्यातलीच एक होऊन डोक्यावर वृंदावन घ्यायचंय, रिंगण धरायचंय ,स्वतःला विसरून जायचंय. आयुष्यात एकदा तरी, एकदा तरी वारीला जायचंय..!!!

आनंदाचा कंद    विठ्ठल सावळा
वैजयंती माळा    शोभे कंठी
जिवालागी जीव   ऐसा गा जडला
वेडापिसा झाला   तुझ्या पायी
संसाराची वाट      अनवट जरी
हात तुझा शिरी     असो द्यावा
मनातच वारी     मनात गजर
मनात पाझर      चंद्रभागा
देहाचेच आता     जाहले मंदिर
आतला अंधार     लोपलासे..

- स्पृहा.