सकारात्मकता... एकदम केवढा मोठ्ठा शब्द आला न सुरुवातीलाच.. हा मूल्यशिक्षणाचा ता(त्रा)स चालू आहे का, असंही मनात येऊन गेलं असेल! पण शाळेत हा शब्द कानावर पडण्याच्या, आणि त्याचा कंटाळा येण्याच्या खूप आधी मला हे शिकवलं एका साध्या पिक्चरने...'आनंद' ने!! तेव्हा त्यातलं सगळंच कळलं होतं अशातला भाग नाही.. पण 'आपण आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी ठेवणं' या कल्पनेतली गंमत जाणवली होती.. पुढे मंगेश पाडगावकरांची 'सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत' ही कविता वाचताना, हा 'आनंद सेहगल' च आपल्याशी बोलतोय, असा साक्षात्कार झाला. आणि एखादा जुना मित्र भेटावा तितका आनंद झाला मला..
मुळात, हल्ली जिथे तिथे ज्याच्या त्याच्या तोंडी 'मला टेन्शन आलंय, फ्रस्ट्रेशन आलंय' हे इतकं सहज ऐकू येतं.
अरे यार, काय रडेपणा चाललाय? ज$$$रा विचार करा, तुम्ही एका गॅलरीत उभे आहात, खालून सांडपाण्याचं गटार वाहतंय, आणि आकाशात एक छानसा लुकलुकणारा तारा आहे; तर तुम्ही आनंदाने तारा बघणार,का गटार बघून तोंडं वेंगाडणार!! चॉइस तुमच्या हातात असतोय की राव !!
कदाचित याच पॉझीटीव्ह भूमिकेमुळे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी 'आनंद' सारखा मास्टरपीस बनवला असेल. त्यांना साथ मिळाली ती गुलजार, योगेश, सलील चौधरी यांसारख्या प्रतिभावंतांची आणि त्याचबरोबर गुणी अभिनेत्यांची.. सतत बोलणाऱ्या, रसरसून आयुष्य जगणाऱ्या आनंदची भूमिका सुपरस्टार राजेश खन्ना अक्षरशः जगलाय. 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही!' असं सांगणारा आनंद मनाला स्पर्श करून जातो, तो उगाच नाही! चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमला खरंतर आपल्याला कळतं की आनंद मरण पावला आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक दृष्यागणिक आपण त्याच्या प्रेमात पडत जातो, आणि तो जिवंतच राहणार असेल, तो मरूच नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत राहतो.. तो गेल्यानंतरचा 'बाबूमोशाय' अमिताभचा आक्रोश हा त्याच्या एकट्याचा नसतो, तर पाणावलेल्या डोळ्यांनी मूकपणे आपल्याही मनात तेच भाव दाटून आलेले असतात..
'आनंद' ची सगळी कमाल हे त्यातील पात्रं ज्या भाषेत बोलतात, त्यात आहे असं मला वाटतं. "जब तक जिंदा हूँ,तब तक मरा नहीं. जब मर गया, साला मैं ही नहीं; तो फिर डर किस बात का!" अंगावर प्रत्येक वेळी काटा येतो हे ऐकताना. आणि पिक्चरच्या सुरुवातीला आकाशात दूर हरवत जाणाऱ्या फुग्यांच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारं येणारं "जिंदगी कैसी है पहेली" हे गाणं??? 'आनंद' चं स्पिरीट सांगणारं हे गाणं, खरंतर शाळांमधून कविता म्हणून शिकवायला हवं! मग मूल्यशिक्षणाचे ओव्हरडोस नसले तरी चालतील..
कारण कसं आहे, सकारात्मकता अशी डोस पाजून 'इंजेक्ट' नाही करता येत.. ती अंगात मुरवावी लागते, रुजवावी लागते.. 'आनंद सेहगल' सारखी! बाकी सगळं सोडून देऊ पण 'आनंद' मधून एक जरी गोष्ट आपण शिकलो न, तरी सगळं साधलं.." मरते मरते चेला गुरु को जीना सिखा गया, दुख अपने लिये रख, आनंद सबके लिये...!!!!"


