Friday, April 8, 2016

सोन्याचे सूर..

काल कुमार गंधर्व यांची जयंती होती. मी त्यांच्या गाण्याची प्रचंड मोठी फॅन आहे. एक अबोल हुरहूर लागून राहते त्यांच गाणं ऐकत असताना. तो मध्येच सुटणारा श्वास अपूर्ण गोष्टी किती सुंदर असू शकतात याची जाणीव करून देणारा. आणि मग एक अगम्य आश्चर्य, गाण्याची ही कमाल या माणसाने फक्त एका फुफ्फुसाच्या आधारे दाखवलीये. एका जीवघेण्या आजारातून उठल्यावर. माळव्यातल्या लोकसंगीताचा प्रचंड अभ्यास आणि त्यातून केली स्वतःची नवनिर्मिती. नवे राग, नव्या बंदिशी. नवा अनवट विचार. सृजनशीलतेचा परिपूर्ण आविष्कार.
यानिमित्ताने आमच्या एका ग्रुपवर अवंती कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीने कवी वसंत बापटांनी कुमारजींवर लिहिलेली एक नितांतसुंदर कविता पाठवली.
कुमार
सकाळच्या उन्हासारखे एकदा याने काय केले,
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले,
टिंबाटिंबामध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले,
वडिलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले.
एवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली,
तशी हा जो सावध झाला
आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला.
सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक जसे तप करते,
धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते,
तसा तोही इमानदार एकाग्र, उग्र झाला
तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला,
तशी हा जो तडक उठला
मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला,
खजुरीच्या बनामध्ये संध्याकाळची सावली झाला.
तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला
मग म्हणे कोणीतरी ह्याच्यासाठी ‘हाय’ म्हणले,
तशी ह्याने काय केले?
कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले.
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला,
कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पाहिला.
एवढ्यामध्ये काय घडले
महाकाल मंदिरात सनामत डमरू झडले
कण्यामधल्या मण्यामधून मल्हाराची नागीण उठली,
चंद्राच्या तळ्यामधून ओम्-काराची तहान मिटली.
आता तसा कुशल आहे
पण स्वप्नात दचकून उठे, म्हणे
माझा सप्तवर्ण, श्यामकर्ण घोडा कुठे?
-    वसंत बापट.
वादळाला शब्दात बांधणं शक्य नाही म्हणतात. पण कविवर्य बापटांनी ते शक्य करून दाखवलंय या कवितेतून. आमच्या पिढीने कुमारांना पाहिलंही नाही. आम्हाला ते भेटले फक्त त्यांच्या सुरांतून. या सुरांनी अचंबित केलं असतानाच या कवितेचे शब्द अवतरले आणि त्या सुरांनी घातलेलं गारूड अधिकच गहिरं करत गेले. कुमारांची अज्ञाताला कवेत घेण्याची ओढ, गाण्याच्या सात स्वरांतून त्यांना त्याच्या पलीकडचं जे काही सांगायचं असेल ते सारं काही आपल्याला ही कविता सांगते. प्रस्थापित वाटेला ठोकरणारा, तसल्या फिजूल चौकटी नाकारणारा त्यांच्यातला मनस्वी कलाकार, कौतुकाच्या चार शब्दांनंतर तिथेच रमून रेंगाळता आपला पुढचा प्रवास सुरू करणारा पांथस्थ. या सगळ्या भूमिका त्यांचं विशेष स्थान अधोरेखित करणाऱ्या आहेत. आपल्या साधनेने, तपस्येने निर्गुणाच्या डोहाचाही तळ गाठू शकणारा, काळाच्या पुढचा कलाकार. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या आभाळाएवढ्या माणसांकडे नुसतंच थक्क होऊन पहायचं आणि आपल्या तोकड्या शब्दांत आपल्या जगण्यात त्यांनी उधळलेलं चांदणं मांडत राहायचा एक प्रयत्न करत राहायचं. हे सप्तवर्ण, श्यामकर्ण शुभलक्षणी घोडे त्यांच्या सुरांतून आपल्याला दिसले, यातच आनंद मानायचा.

 स्पृहा जोशी.

Monday, April 4, 2016

घडतं... बिघडतं !

कोणाला तरी कधी काळी दिलेली काही वचनं, आश्वासनं ..प्रॉमिसेस ... फार अंगावर येतात कधीकधी..कोणाला तरी कशाला, स्वतःच स्वतःला दिलेली प्रॉमिसेस तरी कुठे पाळली जातात नेहमी.. माझ्याकडून अनेकदा होतं असं. म्हणजे, मुद्दाम ठरवून असं नाही..पण शब्द फार सहज दिला जातो . संकल्प अगदी सहज सोडले जातातसंभाषणातल्या काही गोष्टी casually घेतल्या जातात माझ्याकडून . आणि मग एक अपेक्षाभंगाचं ओझं मानगुटीवर येउन बसतंयातून वाढत जाते असुरक्षितता ..नवी नवी कारणं शोधणं..आणि आपलं बरोबरच होतं, हे ठसवण्यासाठी, आपला आत्मविश्वासाचा कोटा शाबूत ठेवण्यासाठी इतरांच्या चुका काढत राहणं.
अर्थात आपल्यापैकी कित्येकांना आत्मविश्वासाचा बूस्टर डोस स्वतःला दिल्याशिवाय चैनच पडत नाही . माझी एक मैत्रीण आहे. कुठल्याही कार्यक्रमाला, पार्टीला कुठेही गेलो, तरी तिचं 'माझा नंबर पहिला' , हे चालूच असतं . म्हणजे प्रवेशच अशा तोऱ्यात करायचाकी आपल्या इतकं महत्त्वाचं आणि ग्रेट त्या ठिकाणी कोणी नाहीच जणू! आणि चुकून तिच्यापेक्षा थोडंसं जास्त महत्त्व दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय असं चुकून जरी लक्षात आलं, की मग तर संपलंचपुढचा संपूर्ण वेळ त्यातच खर्च! असो. विषयांतर झालं.
तर, या प्रॉमिसेस पायी किती तरी गोष्टी घडतात- बिघडतात..सहज सांधली गेली असती अशी नाती तुटतात. कित्येकदा क्षुल्लकच असतं.. आपल्या अपेक्षाही आणि समोरून येणारी कारणं ही .ती क्षुल्लक राहत नाहीत आपल्या हट्टामुळे.. कुठल्या तरी इगोजमुळे. या धडपडीत किती काय गमावतो का आपण..  केवढी तरी शक्ती आणि खूप सारा आनंद.. पुढे मग या सगळ्याचाच कंटाळा यायला लागतो  'माणसं चुकीची नसतात, ती फक्त एकमेकांपेक्षा वेगळी असतात,' हे लक्षात नाही राहत आपल्या .
नाती जपण्याचा अट्टाहास करत असताना थोडंसं दूर राहून त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्नच करत नाही आपण..एखाद्या तलावामध्ये, शांत पाण्यात एखादं कमळ त्याचं त्याचंच तरंगत असतं .पाणी ओढून नाही घेत त्याला आपल्या मध्ये. त्याचं रमणं पाहत रहातं दुरुनच.. दोघांनाही ठाऊक असतंच की एकमेकांमुळेच आपलं अस्तित्त्व आणखी सुंदर होतंय..पण ते लादण्याची, सिद्ध करण्याची गरज नाही लागत त्यांना.. कदाचित तेच प्रॉमिस असेल त्यांच्यातलं..त्यांना पाळायला जमलेलं! आपण हा आपल्याला जमणारा खेळ फक्त काठावरून बघत राहायचं.. आपण केलेली प्रॉमिसेस आठवत.

स्पृहा जोशी


Sunday, March 27, 2016

वर्णनातीत अपूर्णता

कितीतरी दिवसांनी हातात पेन आणि वही घेऊन लिहायला बसले आहे तेही चक्क धावत्या गाडीत.वेगळंच  वाटतंय...एकदम रोमॅन्टिक ! 
मध्यंतरी आमच्या नितीन आरेकर सरांनी ‘ऐवज’ नावाचा एक पुस्तकरुपी खजिना माझ्या हातात ठेवला.त्यात अरुण साधूंनी केलेला पत्रांचा अनुवाद आहे. ती पत्रं आहेत दस्तुरखुद्द पंडित नेहरूंनी त्यांची प्रेयसी..अहं..‘सखी’ म्हणूया...तर त्या सखीला,पद्मजा नायडू यांना लिहिलेली अत्यंत तरल, आशयगर्भ, संवेदनशील आणि हळवी पत्रं. त्यातल्या विचारांची खोली आणि त्यांच्या नात्यांमधली प्रगल्भता यांनी थक्क व्हायला झालं मला. दुर्दैवाने हे नातं पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही,लौकिकार्थाने नेहुरुंच्या समाजातल्या आभाळाएवढ्या प्रतिमेपुढे त्यांच्यातल्या हळव्या प्रेमिकाला चुकवावी लागलेली ही जबर किंमत. पण पत्रं वाचताना त्यात भरून राहिलेला उदास गोडवा एका वेगळ्याच जगात घेऊन गेला मला. त्यातली कित्येक पत्र अशीच आहेत, धावत्या गाडीतून लिहिलेली. कामाचा अशक्यप्राय डोंगर ,राजकारणाचे तणाव, आपल्याच प्रचंड प्रतिमेमध्ये घुसमटणारा जीव..आणि हे सगळं मोकळं मोकळं करणारी ‘आपल्या’ माणसाकडे खेचणारी अनावर उर्मी. जिथे कुठलाही आडपडदा नाही. कुठलंही वेगळं आवरण नाही. कोणत्याही प्रकारचा अट्टाहास नाही. स्वतःच्या ‘खरेपणा’वर कुठलंही बंधन नाही. तिथे आहे फक्त उन्मुक्त अभिव्यक्ती. सडेतोड आत्मपरीक्षण..वेदनांची हळुवार उकल.. आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण! फार सुंदर अनुभव होता ही पत्रं वाचणं.
आज लिहायला बसलेय, तेव्हा लक्षात येतंय किती हद्दपार झाल्यात काही गोष्टी आपल्यातून. ‘माझ्या’ माणसाला मनातलं काही सांगताना मोबाईलचा स्क्रीन किंवा लॅपटॉपच्या कीज खडखडत काहीतरी टाईप करायचं. त्यात नुसताच वेग साधतो. हरवलेल्या ‘आवेगा’चं काय? धावणारे विचार काबूत आणून कागदावर उतरवंताना मजेदार तारांबळ उडते, ती सरावाने ‘प्रोग्राम्ड’ मेंदू अगदी सहज उरकून टाकतो. हरवलेला आहे प्रत्यक्ष स्पर्श. ‘पर्सनल टच’.आपल्या प्रिय व्यक्तीची भेट कधी होईल माहिती नाही. भेट काय, महिनोन्महिने तिचं दर्शनही अप्राप्य आहे. पण संवाद तर साधायचाच आहे 'या मनीचे त्या मनी' घातले नाही, तर ते अपूर्णत्व आपल्यालाच रितं करणार आहे. ही सैरभैर करणारी ओढ. कधीकधी अपूर्ण गोष्टी असतात ना, त्या वर्णनातीत सुंदर भासतात. पूर्णत्वाचं समाधान नसेलही त्यांच्यात कदाचित. पण अर्ध्यात वेगळ्या झालेल्या त्या वाटा धुक्यासारख्या भासतात. गूढ..पण सुंदर.
माझ्यातही ती अनावर उर्मी जागते आहे. याचाच मला आनंद आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे ‘आपलं’ जग शोधण्याची उर्मी. गूढ, अपूर्ण, पण सुंदर..!!

 स्पृहा जोशी

Monday, March 14, 2016

कळणं...कळून घेणं...

‘पीवी’ज बिग अॅडव्हेंचर’ नावाचा सुंदर चित्रपट पाहिलायत तुम्ही? अतिशय खेळकरपणे संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. एका प्रसंगात तो त्याच्या गर्लफ्रेंडला, डॉटीला म्हणतो, “माझ्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी गोष्टी, ज्या तुला कधी कळल्याच नाहीत, आणि अशाही कितीतरी गोष्टी ज्या तू कधी कळूनच घेतल्या नाहीस.” मला फार आवडला हा संवाद. किती सहजपणे किती मोठी गोष्ट बोलून गेलाय पीवी.
आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट खरंतर. रोज भेटणाऱ्या, जवळच्या- लांबच्या माणसांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर नातं जोडत असतो आपण. त्यावेळेस प्रत्येकासमोर मन मोकळं करायची वेळच येत नाही. तशी गरजही नसते म्हणा. पण हळूहळू वेगवेगळी आवरणं आपल्यावर चढत जातात. परिस्थिती, घटना, व्यक्ती आपल्यावर परिणाम करत राहतात. त्यांच्या सोयीने आपण स्वतःला वाकवत राहतो, बदलत राहतो. गुंतून जातो त्यांच्या विश्वात. त्या गजबजाटात आपण ‘खरे’ कसे आहोत, किंवा ‘होतो’ हे विसरायलाच होतं..
आणि अचानक मग कधीतरी निवांत वेळी ‘आपल्या’ माणसासोबत असताना आपल्या लक्षात येतं, की नको त्या कोलाहलात किती पुसट होऊन गेलंय सगळं. जसे आपण बदललो, तसाच आपल्या सगळ्यात जवळचा वाटणारा माणूसही बदलला. कळलंच नाही इतकं मोठं स्थित्यंतर होत असताना. फार गृहीत धरलं सगळंच... आपली प्रायव्हसी, आपली स्पेस सगळं हातात आलंय, पण समोरचा माणूससुद्धा त्याच वेळेस त्याची प्रायव्हसी, त्याची स्पेस शोधत निसटून गेलाय कुठेतरी. तर कुठे कुठे नेमका याच्या उलट प्रकार. दोघंजण इतके बुडून गेलेले एकमेकांमध्ये की कोणालाच काही धड अस्तित्व नाही. वेगळ्या वाटांची आवड नाही. एकाने दुसऱ्यावर केलेली कुरघोडी संपवून टाकणारी. ‘तुझं सुख तेच माझं सुख’ याचं अतिरेकी टोक. इतकं, की निर्भेळ स्वातंत्र्याचा आनंदच नाही. आणि मग एक मुक्कामावर पोहोचून लक्षात येतो भलताच प्रकार, एकमेकांत इतके आकंठ बुडूनही माणूस कळला नाहीच की आपल्याला!!  पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे. “छेडणार जर होतो आपण गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर! इतुके आलो जवळ जवळ की ‘जवळपणाचे’ झाले बंधन!”
थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांनाच कधी न कधी हे असं वाटून गेलेलं असतंच. भूमिका बदलतात फक्त. कधी आपण ‘पीवी’ असतो, तर कधी ‘डॉटी’. काही गोष्टी आपल्याला कळल्याच नाहीत, आणि कित्येक गोष्टी ज्या आपण कळूनच घेतल्या नाहीत. वरवर पाहत राहिलो सगळंच. चित्रपटाच्या शेवटी डॉटी पीवीला विचारते, “इतका आटापिटा केलास, आणि आता फिल्म अर्धवट सोडून चाललायस?” पीवी म्हणतो, “मला हे ‘बघायची’ गरज नाही डॉटी; मी हे जगलोय!!” आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या माणसांशी, गोष्टींशी हे ‘असं’ जोडून घेता येईल आपल्याला? वरवरचा चित्रपट बघण्यापेक्षा, त्यात शिरून तो जगता येईल..?? 

स्पृहा जोशी

Monday, March 7, 2016

'सहज'तेची किंमत

प्रिशिला सिटेनेइ (तिचे केनियन भाषेतील टोपण नाव गोगो म्हणजे आज्जीबाई). ६५ बर्षे दाई (सुईण) म्हणून काम केलेली प्रिशिला ९० व्या वर्षी प्राथमिक शाळेत जायला लागली. ह्या आधी तिला ही संधीच मिळाली नव्हती. तिच्या वर्गमित्रांपैकी ७ जण तिचीच खापरपतवंडे आहेत. ती गणित, science, english हे शिकतेच आहे पण त्याबरोबरच PT, Dance हयामध्ये सुध्दा उत्साहाने भाग घेते. तिच्या अनुभवीपणामुळे अजून तिच्याकडे बायका शनिवाररविवारी सुईणपणा विषयी सल्ला घ्यायला येतात. वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिला का वाटलं असेल हे करावंसं? कुठल्याही रेकॉर्डस् मध्ये तिला तिचं नाव नकोय.   तिच्याकडे या सगळ्याची काही साधी सोप्पी कारणं आहेत.  
१.ज्या केनियात आजही स्त्री-शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या केनियातल्या सगळ्या मुलींना तिला स्वतःच्या उदाहरणातून हा संदेश द्यायचाय की शाळेत जाऊन शिकलंच पाहिजे. 
२.तिला सगळ्या वनौषधींची माहिती पुढच्या पिढीसाठी संकलित करून ठेवायची आहे. जे लिहिता – वाचता येत नसल्यामुळे इतक्या वर्षांत तिला करता आलं नव्हतं. आपलं ज्ञान असंच वाया जाऊ नये, यासाठी तिची ही सगळी धडपड आहे. 
३.तिला स्वतःला एकदा तरी ‘बायबल’ वाचायचं आहे..!
कुठून आलीये ही असामान्य दृष्टी आणि हे असं धाडस तिच्यामध्ये? काय प्रेरणा असेल या सगळ्यामागे? आपल्या महाराष्ट्राशी याची तुलना करायला गेलं, तर असं वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत कारण आपण ‘महाराष्ट्रा’सारख्या प्रागतिक राज्यात जन्माला आलो. जिथे प्रबोधनाची परंपरा रुजली. स्त्री- शिक्षणाची चळवळ फोफावली. महात्मा फुले, सावित्रीबाई, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई, आनंदीबाई जोशी, महर्षी कर्वे यांनी आणि अशा कित्येकांनी आपल्या कर्तृत्त्वाने आमच्यासमोर कित्येक दारं खुली करून दिली. परंपरेच्या मुसक्या सैल केल्या. डोळ्यांना स्वप्नं पहायची सवय लावली. आज आम्हाला ‘शिक्षण घेणं’ यासाठी वेगळा विचार करावाच लागत नाही. ते आमच्यासाठी अत्यंत सहज आणि स्वाभाविक बनलंय. ज्योत्स्ना भोळे, कमलाबाई गोखले ह्यांच्यामुळे रंगभूमीवर काम करायला मुलींना मोकळीक मिळाली. केसरबाई केरकर हिराबाई बडोदेकरांमुळे बायका संगीतसाधना करू शकल्या. या सगळ्यांनीच आपापलं कुल- शील जपत कलांनासुद्धा एक साजरं, प्रतिष्ठित रूप मिळवून दिलं.

आज ताठ मानेने आम्ही आमची करीयर्स करू शकतोय ते या साऱ्यांमुळेच. आमचे निर्णय घेऊ शकतोय ते त्यांच्या काळात त्यांनी सोसलेल्या, अंगावर झेललेल्या अनंत अडचणींमुळेच. पण आपल्या पिढीच्या किती जणींना हे माहिती आहे? या सगळ्यांबद्दल कृतज्ञता तर सोडाच, पण यांची नावं सुद्धा पार पुसून टाकलीयेत आपण आपल्या आठवणींतून. प्रीशीला आजींचा संघर्ष आपल्याला आज करावा लागत नाही, कारण या पिढ्याच्या पिढ्यांनी आपलं रक्त आटवलय त्यासाठी. आपण मात्र हा सगळा इतिहास विसरून आपलं मनमानी स्वातंत्र्य गृहीत धरतो आहोत..आणि प्रागतिक विचारांचा आपला महाराष्ट्र दिवसेंदिवस काळाचं चक्र उलटं उलटं फिरवू पाहतो आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा शोध लागण्याआधीच, ती भीती विरण्याआधीच कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ला हा कशाचं द्योतक म्हणायचं?

डॉ. अरुणा ढेरेंनी आपल्या एका लेखात फार सुंदर लिहिलंय."सनातनी जीवनपद्धती ही काही अविचाराने स्वीकारण्याची गंमत गोष्ट नाही,आणि स्वातंत्र्य हे काही खेळण्यासारखे टाकून देण्याजोगे मूल्य नाही." आपल्या आसपास चाललेल्या सगळ्या भयावह गोष्टी पाहताना किमान हा विचार, हे स्वातंत्र्य शहाणपणाने टिकवू शकू आपण? नुसत्या पुस्तकी घोकंपट्टी आणि घसघशीत पॅकेजपलीकडे जाऊन प्रीशीला आजीचा तो आत्मविश्वास मिळवू शकू आपण?

- स्पृहा जोशी

Wednesday, February 24, 2016

‘डूडल डायरी’

मध्यंतरी ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ला गेले होते. मला आवडतं अशा ठिकाणी. खूप वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या कल्पना.. सुंदर संमेलन असतं.. तऱ्हेतऱ्हेचे लोक दिसतात.. त्यांच्या गप्पांचे विषय.. त्यांचे कपडे.. मध्येच अतिशय सुंदर अशा शिल्पकृती, पेंटींग्ज, आणि मोकळी हवा! मस्त मजा आली.. आपलं रुटीन बदलावंसं वाटत असेल न, तर मधूनच अशा एखाद्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.. फार ताजंतवानं वाटायला लागतं. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे खरेदी!! ती मनसोक्त करता येते..आणि गोष्टी तरी किती वेगवेगळ्या.. साड्या, कुर्ते हे नेहमीचं झालंच, पण छोटे छोटे दिवे, बिलोरी आरसे, कोरीव बांगड्या, छोटेसे बुकमार्क्स, हाताने रंगवलेली कानातली, सुवासिक साबण, वॉल हँगिंग्स कितीतरी गंमतीच्या गोष्टी.. कितीतरी वेळ हे सगळं नुसतं बघण्यातच मजेत  निघून जातो. या वेळेस माझ्या खजिन्यात किती नव्या नव्या गोष्टी आल्या.. ‘मधुबाला’चं चित्र असलेली सुंदर बॅग, एक राखाडी निळं जॅकेट, आदिवासी बायका घालतात तसलं डोरलं, शेरलॉक आणि गँग्ज ऑफ वासेपूर मधल्या फैझलची चित्रं.. मजा नुसती.. आणि या सगळ्या खजिन्यात मला सगळ्यात आवडलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे एक डायरी. ‘डूडल डायरी’.
मस्त आहे ही डायरी.. फिरता फिरता एका स्टॉलवर सहज हाताला लागली. आता खरंतर डायरी सारखी डायरी. तिचं काय एवढं कौतुक.. पण हिची स्पेशालिटी म्हणजे, या डायरीच्या प्रत्येक पानावर एक शब्द दिलाय. अगदी साधासा. म्हणजे उदाहरणार्थ, ‘फ्लॉवर’, ‘लिब्रा’, ‘गार्डन’, ‘शिप’... असं काहीही.. रोजच्या तारखेला एक नवा शब्द. आता आपण काय करायचं, रोज त्या शब्दाबद्दल आपल्या मनात जे काही येतंय, ते नोंदवून ठेवायचं.. हवं तर चित्र काढा, हवं तर कवितेच्या ओळी लिहा, हवं तर त्या शब्दावरून एखादी व्यक्ती आठवली तर तिच्याबद्दल लिहा.   काहीही करा. ती ‘स्पेस’ तुमची. लिहित जायचं, सुसाट सुटायचं! गेले दोन महिने या डूडल डायरीने एक नवा छंद लावलाय मला..
मित्रांनो वरवर वाचताना हे साधंसं वाटेल कदाचित. ‘त्यात काय एवढं’ असंही वाटून जाईल कोणाला.. पण यातली गंमत खरंच खूप जास्त आहे. एक मजेशीर लहानपणाचा अनुभव देते ही डायरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मेंदू भरकटत असतो आपला, एकाच वेळेला हजार ठिकाणी धावत असतो. त्या नाठाळ चोराला कान धरून एकाच शब्दावर थांबायला लावते. पण तोही शहाणा.. त्यातून वाट काढू पाहतो.. आणि मधल्यामध्ये आपल्याला सापडतात एकाच शब्दाशी जोडल्या गेलेल्या कितीतरी डायमेंशन्स.. एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी कल्पना... आणि मग आपल्यासमोर आपल्याच बालिश चित्रांतून, चार दोन कवितांच्या ओळीतून फुललेला दिसतो रंगीबेरंगी कोलाज.. ओबडधोबड.. पण सुरेख..! गेले काही दिवस मी ही मजा अनुभवते आहे. रोज स्वतःच स्वतःला शाबासकी देते आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे त्या डायरीच्या पानांतून पुन्हा पुन्हा फिरताना खळखळून हसते आहे..   
आजच्या ‘गुड मॉर्निंग’ला तुम्हीही ही सुरुवात नक्की करून पहा.. आणि सांगा मला तुमची ‘डूडल डायरी’ तुम्हाला काय देतेय ते!!

-    स्पृहा जोशी.


Thursday, February 4, 2016

स्वीकार

ओशो रजनीश. भारतातल्या विवादास्पद पण तितक्याच लोकप्रिय अध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव. त्यांचे सिद्धांत, मूल्यधारणा या गोष्टींवर वाद असतील कदाचित. किंबहुना आहेतच. पण त्यांचे विचार हे अतिशय पारदर्शी आणि स्वतःला शोधत खोल खोल नेणारे आहेत.
   “जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता, ती गोष्टच तुम्हाला दुसऱ्याचा स्वीकार करण्यासाठी योग्य बनवत असते. आणि जेव्हा कोणी त्यांचा स्वीकार करतं, तेव्हाच ते ‘स्वीकारा’तला आनंद शिकत असतात. किती शांतीपूर्ण आहे हे. आणि मग तेही दुसऱ्यांना स्वीकारायला लागतात. जर संपूर्ण मानवता या बिंदूपाशी येऊन पोचली, जिथे प्रत्येकजण तो ‘जसा आहे तसा’ स्वीकारला जाईल, तर जगातली नव्वद टक्के दुःखं अशीच संपून जातील.” 
                                       – ओशो रजनीश.
.... इथेच आधी थांबायला होतं. पहिल्या ओळीवरच. स्वतःचा स्वीकार? म्हणजे काय नेमकं? आपण पूर्णपणे ओळखलेलं असतं स्वतःला? नेमकं काय हवंय स्वतःकडून, समोरच्याकडून ते आपल्याला ठाऊक असतं? कित्येकदा आपण झुली पांघरतो. वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्या रंगाला हरवू देतो. कित्येकदा आपण ‘असं’ काही करतो आहोत हेसुद्धा कळत नाही. ‘कोणासाठी तरी’ म्हणून इच्छा, स्वप्नं दडपली जातात. पण आपल्यासाठी ती सहज गोष्ट असते. निदान त्यावेळेपुरती तरी. आपण त्याला नशीब म्हणतो, प्राक्तन म्हणतो, देवाची इच्छा असंही म्हणतो. पण नेमकं त्यावेळेला आपल्याला ‘ते’ हवं होतं, की नाही याचं प्रांजळ उत्तर आपण नाही देऊ शकत. किंबहुना तसा प्रश्न विचारायलाच कचरतो आपण. कारण सरळ आहे. प्रत्येक पावलावर स्वतःला जे फसवलंय, ते ढळढळीतपणे सामोरं येईल म्हणून. त्याला तोंड द्यायला कचरत असतो आपण म्हणून.
पण मग अशा वेळेस स्वीकार कोणाचा करायचा? आपण जे आहोत, त्याचा? की आपण जे आहोत असं दाखवतो, त्याचा?? हे कळलं तरी पुष्कळ आहे. कारण या पहिल्या पायरीशी न झगडता आपण दुसऱ्या पायरीवर थेट उडी मारली तिथेच सगळा झोल झाला! डायरेक्ट दुसऱ्याचा स्वीकार. पण कसा? कारण तिथे तो बिचाराही याच डायलेमामध्ये अडकलेला असणार. खोटेपणाचा हाच खेळ.. वर्षानुवर्ष. पिढ्यानपिढ्या.. निदा फाझली फार सुंदर लिहून गेलेत.
“किसी कसाईने इक हड्डी छील कर फेंकी
गलीके मोड से दो कुत्ते भोंकते उठे
किसी ने पाँव उठाए
किसी ने दुम पटकी..
न जाने मेरा जी चाहा
अपने सब कपडे उतार कर
किसी चौराहे पर खडा हो जाऊँ
हर एक चीज पर झपटूँ
घडी घडी चिल्लाऊँ
निढाल होके – जहाँ चाहूँ
जिस्म फैला दूँ
हजारो साल की सच्चाइयों को झुठला दूँ....”
हाच तो ओशो म्हणतात तो ‘स्वतःचा’ स्वीकार.. ही ती पहिली पायरी. मग आपण स्वीकारतो ते कोणाला? की खरंतर कोणालाच नाही? या प्रश्नांचं हो/ नाही मध्ये उत्तर नाही. पण ‘जसं आहे तसं’ जगणं आणि जगू देणं याला फार मोठं धाडस लागतं. ‘जीवन अभी यही है’, आणि ‘प्रत्येक पल मरो, ताकी तुम हर क्षण नवीन हो सको’ म्हणणारे ओशो या खरेपणामुळेच एकाच वेळेला नकोसेही वाटतात, आणि हवेसेही!  

स्पृहा जोशी