Monday, June 6, 2016

बदल...

पर्सनॅलिटी बदलावी लागते. आहार-बिहारात बदल करावा लागतो. काही अप्रिय परिस्थितींचा स्वीकार करावा लागतो. पण सध्या ही प्रयोगशीलता अंगिकारली जातेय. हा बदल चित्रसृष्टीला एका नव्या वळणावर घेऊन जाणारा आहे. एखाद्या चित्रपटाला मिळणारं यश, एखाद्या कलाकाराला मिळणारी प्रसिद्धी, त्याच्या फिटनेसचं झालेलं कौतुक हे रिले रेससारखं असतं. त्याच्या या प्रसिद्धीमुळे प्रेरणा घेऊन अनेकजण इतके कष्ट घेण्यास सिद्ध होतात. धावताना दुसऱ्याच्या हातातली बॅटन घेण्यास हात  आपोआप पुढे सरसावतात. यासारखी चांगली गोष्ट ती कुठली ?
चित्ररसिक बदल स्वीकारत आहेत. ही आणखी एक नोंद घेण्याजोगी बाब आहे. मध्यंतरी 'फुंतरु'च्या निमित्ताने आपण हा अनुभव घेतला आहे. सुजय डहाके या प्रयोगशील दिग्दर्शकाने ही सायफाय स्टोरी सदर केली तर 'पेइंग घोस्ट' या चित्रपटाने 'व्हिएफ एक्स' या तंत्रज्ञानाचा आधार घेतला. चित्रपटाचा सत्तर टक्के भाग या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रित करण्यात आला होता. मराठी चित्रसृष्टीतला असा हा पहिलाच प्रयत्न... पण ह्या प्रयत्नामुळे मराठी चित्रपटांची तंत्रज्ञानावरची पकड लक्षात येते. 'सैराट' मध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अविष्कार बघायला मिळाला नसला तरी कटू वास्तव पोहोचवण्यासाठी निवडलेला सरधोपट मार्गही अभ्यासण्याजोगा आहे. ही काही नव्याने आलेली प्रेमकथा नाही. अशा अनेक प्रेमकथा आपण पाहिल्या आहेत. मात्र ऑनर किलिंगसारख्या महत्त्वपूर्ण विषयाला तोंड फोडण्यासाठी आणि समाजातील कटू वास्तव दाखवण्यासाठी नागराजने या लोकप्रिय स्टोरीचाचं आधार घेतला. त्यामुळे त्यालाही कडू गोळी हवी तशी पोहोचवता आली. ही भारतीय समज मराठी चित्रसृष्टीला नव्या वळणावर घेऊन जाणारी आहे. 
आतापर्यंत मराठी चित्रसृष्टीने नानाविध विषय हाताळले. जुन्या काळाचा परामर्श घेता ठराविक काळामध्ये ठराविक धाटणीच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळायची हे स्पष्ट दिसतं. तमाशापट, विनोदी चित्रपट, ग्रामीण ढंगाचे चित्रपट आदींना प्रसिद्धी मिळण्याचा एक कालखंड होता. आता मात्र रसिक सर्व प्रकारची मांडणी आणि सर्व प्रकारच्या विषयांचं स्वागत करत आहेत. म्हणूनच मराठी कलाकार प्रयोगशील होत आहेत. मराठी चित्रपटांतील बदल हा काही एका रात्रीत घडलेला नाही. श्वास पासून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर सतीश राजवाडे, गजेंद्र अहिरे, संजय सूरकर, महेश मांजरेकर, निशिकांत कामत यांनी हळूहळू वेगवेगळ्या धाटणीच आणि विषयांवरचे चित्रपट स्वीकारायची प्रेक्षकांना सवय लावली. आणि त्यातूनच आजचा हा काळ आपल्याला अनुभवायला मिळतो आहे.

- स्पृहा जोशी 
(An excerpt from conversation with Daily Sanchar newspaper)